मुंबई: महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत असताना, त्या अभूतपूर्व सामाजिक क्रांतीला अभिवादन करण्याच्या उद्देशाने मा. राजकुमार बडोले लिखित व युगंधर क्रियेशन एल.एल.पी. प्रस्तुत “पाण्याने पेटला वणवा” या नाटकाच्या उद्घाटन सोहळ्यास यशवंतराव नाट्यगृह, माटुंगा (पश्चिम), मुंबई येथे उपस्थित होतो. या नाटकाच्या माध्यमातून महाडच्या ऐतिहासिक संघर्षाची प्रेरणा, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांची प्रखर ताकद आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीची ऊर्जा अनुभवता आली.महाडचा चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्याच्या हक्कासाठीचा संघर्ष नव्हता; तर तो माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, स्वाभिमान, समानता आणि मूलभूत हक्कांसाठी दिलेला ऐतिहासिक लढा होता.या ऐतिहासिक घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत असताना, तिचा संघर्षमय इतिहास नाटकाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा अत्यंत प्रभावी प्रयत्न आहे.सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी केवळ रस्त्यावरील संघर्षातूनच घडत नाहीत, तर साहित्य, कला आणि संस्कृतीच्या प्रभावी माध्यमातूनही त्या अधिक व्यापक होत जनमानसात रुजतात. “पाण्याने पेटला वणवा” हे नाटक सामाजिक जागृतीच्या या प्रवासाला नवी दिशा आणि ऊर्जा देईल, असा दृढ विश्वास आहे.
या कार्यक्रमास मा. भीमराव यशवंतराव आंबेडकर हे देखील उपस्थित होते. या उल्लेखनीय नाट्यकृतीबद्दल मी मा. राजकुमार बडोले तसेच संपूर्ण नाट्यसंघाचे मनःपूर्वक अभिनंदन करुन त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments